सोनगीर येथे, राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा

अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान


सोनगीर दि. 31 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जगाच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सैनिकांची फौज उभी करून महिलांना सशक्त आणि स्वयंपूर्ण 



करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते ऍड. अविनाश धायगुडे यांनी केले. ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त सोनगीर येथे राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते.
शुक्रवार दि. 30 रोजी रात्री संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. पी. आय. सचिन कापडणीस होते. प्र. सरपंच लखन ठेलारी, माजी सरपंच दंगल धनगर, शांतीलाल धनगर, सुरेश धनगर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाजन, धुळे जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आर के माळी, धनगर समाज पंच कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शंकर धनगर, उपाध्यक्ष मोहन तुकाराम, सचिव भाऊ , भास्कर धनगर, धनगर, पत्रकार प्रमोद धनगर आदी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री धायगुडे म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे माळवा प्रांतावर राज्य केले. या काळात त्यांच्यावर अनेक संकटे आली, पण त्यांनी धार्मिक कार्यासोबतच राज्याच्या संरक्षणासाठी महिलांची सशक्त फौज उभी केली. त्यांच्या कार्यामुळे शत्रूलाही त्यांच्यावर आक्रमण करताना विचार करावा लागत होता. त्यांनी महिलांसाठी हुंडाबंदी कायदा आणि विधवा महिलांना मूल दत्तक घेण्याचा कायदा केला. महिलांचा छळ करणाऱ्यास भर चौकात चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली आणि बालविवाहांवर बंदी घातली.हिदुस्थानात अनेक ठिकाणी मुस्लिम राजवटी असतानाही त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरे उभारून हिंदू धर्माला नवचेतना दिली, असेही ते म्हणाले.
अहिल्यादेवींनी देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा पाया रचला, असे सांगून श्री धायगुडे म्हणाले की, त्यांनी महेश्वर (म. प्र) येथे साडी विणकामाचा मोठा कारखाना सुरू करून महिलांना रोजगार दिला आणि त्यांना आत्मनिर्भर बनवले. ज्या वर्षी दुष्काळ पडला, त्या वर्षाचा शेतसारा माफ करून शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य आणि बी-बियाणे मोफत पुरवले. त्यांच्या राज्यात शेतकरी केंद्रस्थानी होता.
अहिल्यादेवींच्या काळात धार्मिक सलोखा होता. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीय आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत होते. बाबरी मशीद विध्वंसानंतर देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या, पण इंदूर आणि महेश्वरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, कारण तेथील लोकांमध्ये अहिल्यादेवींनी दिलेली समतेची शिकवण आजही कायम आहे. त्यांनी वारकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी पंढरपूर आणि संबंधित ठिकाणी धर्मशाळा व अन्नछत्र बांधले, तसेच यात्रेकरूंचे संरक्षण केले. भिल्ल आणि आदिवासी समाजाला जमिनी देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला.
इतिहासकारांनी बहुजन समाजातील शूरवीर समाजसुधारकांचा इतिहास लिहिण्यात कुचराई केली, असे मत व्यक्त करून श्री धायगुडे म्हणाले की, यापुढे महाराजा यशवंतराव ब्रिगेडच्या माध्यमातून या महापुरुषांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गुंजन महेश धनगर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

Comments